आपला महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र

आपण मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातो तेव्हा नेहमीच तिथे कचऱ्याचे ढिगारे पाहावयास मिळतात. सण-उत्सवाच्या पवित्र काळात तर या ढिगाऱ्यांमध्ये शतपटींनी वाढ झालेली दिसते. आपण निसर्गाच्या या सुंदर घटकाचा होत असलेला ऱ्हास पाहून मनात हळहळतो आणि पुढे निघून जातो. परंतु गेले एक वर्ष दादर येथील जय श्रृंगारपुरे हा एक तरुण या घाणीच्या साम्राज्यात पाय रोवून उभा आहे. मुंबईमधील समुद्र किनारे कचरामुक्त करण्याचं आव्हान त्याने स्वीकारलंय!

जवळपास वर्षभरापूर्वी जय आपल्या मुलीला दादर येथील शिवाजी पार्क चौपाटीवर खेळायला घेऊन गेला होता. तिथे गेल्यावर मात्र त्याची निराशा झाली. किनाऱ्यावर सर्वत्र मोठे मोठे कचऱ्याचे ढीग त्याला तयार झालेले दिसले. आपण या कचऱ्याच्या साम्राज्यात जगतोय जिथे आपल्या मुलांना साधी खेळायला ही जागा मिळत नाही, याचे त्याला वाईट वाटले. त्याच दिवशी स्वत:हून पुढाकार घेत चौपाट्यांची झालेली दुरावस्था बदलण्याचा चंगच त्याने बांधला. सुरुवातीचे काही महिने तो स्वत: आपल्या कुटुंबियांसहित प्रत्येक रविवारी जाऊन चौपाटीवरील कचरा गोळा करु लागला. त्यावेळी तिथे हजर असणारे काही लोकही मदतीसाठी पुढे देखील आले.

पण बरेचजण ‘तू हे का करतो आहेस, वेडा झाला आहेस का? असा प्रश्न त्याला विचारू लागले. त्यावर जयने ‘तुम्ही करत नाही, म्हणून मला करावं लागत!’ असं उत्तर देत आपलं काम अधिक जोमाने पुढे नेलं.

सोशल मीडिया व वाढता प्रतिसाद

या स्वच्छता कार्यात त्याला सोशल मीडियाची मोठ्या प्रमाणात मदत झाली. चौपाटीवर साफसफाई करतानाचे व्हिडीयोज, फोटोज तसेच सापडणाऱ्या हानिकारक वस्तूंची माहिती जय सोशल मीडियावर शेअर करीत होता. त्याचाच फायदा असा झाला की अनेक लोकांपर्यंत त्याचे हे कार्य पोहचले व अनेक मदतीचे हात पुढे सरसावले. सुरुवातीला कुटुंबापासून त्याने सुरु केलेल्या या स्वच्छता चळवळीत आता सुमारे ५०-७० लोक, विविध संस्था, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी स्वत:हून सहभागी होतात. प्रत्येक आठवड्याला सुमारे १५-२० नवीन स्वयंसेवकांची यात भर पडते आहे.

 

जयच्या या स्वच्छता मिशनचे कौतुक अनेक सुप्रसिद्ध कलाकार, क्रिकेटर्स, मान्यवरांनी सोशल मीडियावर केले आहे. इतकेच नाही तर Ministry of Housing and Urban Affairs, Government of India यांनी ट्वीट करत या कार्याची विशेष दखल घेतली आहे.

 

A prolific finisher, a reliable batsman of Mumbai Cricket Association, former Vice-Captain of Kolkata Knight Riders & currently a part of Mumbai Indians. Suryakumar Yadav Official supports Jay Foundation in our cause of Dadar Beach Clean Up????

Posted by Jay Shringarpure on Saturday, 31 March 2018

 

Marathi Superstar Swwapnil joshi speaking about Jay Foundation and Dadar Beach Clean Up ! ????

Posted by Jay Shringarpure on Monday, 26 March 2018

 

Thank you Bharat Jadhav Sir for showing your support… It means a lot…

Posted by Jay Shringarpure on Tuesday, 27 March 2018

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तानाजी घाग व बागवे यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य त्यांना केले आहे. परंतु कोणत्याही राजकीय पक्षाची कधीच मदत त्याने घेतली नाही. या कार्यासाठी लागणारा आर्थिक निधी सध्यातरी तो स्वत:च्या खिशातून खर्च करतो.

आपल्या या कार्याविषयी जय अधिक सांगतो की, “आपल्याप्रमाणे समुद्राला देखील जीव आहे, त्याला जे पचत नाही असे अविघटक पदार्थ तो बाहेर फेकत असतो”. असा हानिकारक कचरा हा एखाद्या हानिकारक आजारी माणसाइतकाच समाजाच्या आरोग्यास धोकादायक ठरु शकतो. त्यामुळे आपण घरातच ओला कचरा-सुका कचरा वेगळा करायला हवा. प्लॅस्टिकच्या वस्तू कचऱ्यात अजिबात फेकू नयेत. अनेक वेळा डॉक्टर, इस्पितळ यांमध्ये वापरलेल्या औषधांच्या बाटल्या इंजेक्शन्स, ऑक्सिजन मास्क देखील किनाऱ्यावर साफसफाईत आढळतात. अनेक लहान मुले बीचवर खेळत असतात. ते या वस्तूंच्या संपर्कात आल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा वापरानंतर अशा हानिकारक वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावावयास हवी.

आता जय फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक शाळा,कॉलेज व सोसायटीजमध्ये स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे. कचऱ्याचे विघटीकरण,वर्गीकरण कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. ‘आपला महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र ’ ही केवळ एखादी मोहीम न बनता लोकांची सवय बनायला हवी. आपल्याला तसेच येणाऱ्या पिढीला कचरामुक्त परिसरात मोकळा श्वास घेता यावा, इतकीच जयची इच्छा आहे. त्यांच्या या कार्यात आपणही सहभागी होऊया. किमान आपला परिसर आठवड्यातून एकदा एकत्र येऊन स्वच्छ करुया!

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.